Tuesday, 6 September 2016


"तूको बादशाह" च्या निमित्याने .... 

प्रपंच  समाज मग तो राजकीय असो सामाजिक असो वा हरेक अंगाने जुडलेला असो , आजूबाजूच्या परिस्तिथीला सामोरे जाता-जाता अचानक मन विरक्तीकडे वळलेले आणि तेथून सुरवात होते अध्यात्माकडे वळण्याची की जेथून सुख-दुःखे एकसम वाटू लागतात अन ही जाणीव अभंगाच्या गाभाऱ्यातून हळूच उदयास येते ... व सुरवात होते समाज प्रबोधनाला
सभोतालची परिस्तिथी बिघडलेल्या रूढी परंपरा यावर मरम्मत व मलम लावून मुळासकट अनैतिक विचारांना हद्द पार करण्याला , जोड असते वैश्विक विचारांची .... एवढे सामर्थ्य अभंगातून प्रसवतं असतं.
वेळोवेळी काळानुसार या जगाला वैश्विक संतरूपी  गुरूंची गरज भासली आहे व ती काळानुरूप पुर्णत्वाला सुद्धा आली आहे. या यादीत अग्रगण्य संत नामदेव , संत ज्ञानेश्वर , संत चोंखामेळा , संत तुकाराम महाराज , संत कबीर , संत तुकडोजी, संत गाडगे बाबा आदी संत महापुरुषांमुळे त्यांच्या लिखाणातून समाज जागृती झाली आहे .
त्यात संत तुकाराम महाराज अत्यंत परखड व्यक्तिमत्व होते . त्यांचे अभंग ओव्या व इतर साहित्य लिखाण जन-सामन्याच्या काळजात रोवल्या जायच्यां  . अशिक्षित समाजाच्या तोंडपाठ त्याच्या रचना राहतात . व लिखाण परखड असल्याने त्यांना त्यावेळी बराचसा विरोध हि झाला . आजवर त्यांच्या लिखाणावरबरीच शोध प्रबंध लिहिलीत व अभ्यासली सुद्धा ...
     अशात प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांचं लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून , सोशल मीडियावरून वाचण्यात आले. वेगवेगळ्या लिखाणावर त्याची  पकड मजबूत आहे.  हल्लीच  त्यांचं अभंग छंदातील "तूको बादशाह " हे पुस्तक हाती आलं

तूको बादशाह  देई शब्ददान
करी धनवान लेखणीला
अगा शब्दराजा  होई कृपावंत
ओत आशयात  पंचप्राण

असे बहारदार शब्द सुमने त्यांनी रचनेतून  तुकाराम महाराजाना वाहिली . महाराजाना ते संतातील 'बादशाह' असे संभोवतात . याचक म्हणून प्रजा म्हणून त्यांच्या लेखणीला बळकटी मिळण्याकरीता मार्मिक आशीर्वाद मागताना दिसत आहेत .

मुखातून माझ्या  बोले तुकाराम
तोच आत्माराम अभंगाचा

कवी यावर तुकाराम महाराजांशी भक्तापारी लिन झाले आहेत .  एकरूप झाले आहेत , कि जे ते लिहिणार बोलणार ते सार महाराज करवून घेतील . राऊत येथे महाराजांच्या विचारांशी  आत्मरूप झाले आहेत .

कवितेचा देव  तूच एक तुक्या
बाकी सारे नख्या   कापसात
तूच एक राजा  नगदीचा पीक
बाकी झिकझिक  उधारीचे 
तूच कलंदार  रोकडीचा दाम 
बाकी जोडकाम  कुसरीचे 
तूच दूर केले  डोळ्याचे पडळ 
अंतरीची कळ  कळों आली 

आपल्या बौध्दिक चातुर्य व तसेच उत्तम लिखाणाची चुणूक राऊत यांची दिसून येते . तुकाराम महाराज यांची महती अगदी मोजक्या शब्दात करवून महाराज संतांमध्ये सर्वोश्रेष्ठ कसे आहेत येथे स्पष्ट केले..

मन भ्रमाचे भांडार
त्याची किमया अपार

यात मना विषयी सांगताना ... ते क्षणात येथे तर ... क्षणात छू -मंतर ... मनाच्या अस्थिरतेबद्दल मोठ्या खुबीने विशद केले आहे .

साहेबांच्या लाथा  मानाव्यात गोड
आले जरी फोड   ढुंगणाला

साहेबांची थुंकी  झेलावी चाटावी
आणिक वाटावी सेवा भावे

नौकरदार वर्गावर होणारी पिळवणूक अत्यंत परखड शब्दात मांडली आहे. हुद्द्याच्या जोरावर वरिष्ठ पिळवणूक व फसवणूक करतात फायदा घेतात . ह्या अभंगातून विदारकता दिसून येते

आकाश ठेंगणे  अहंकाराहून
ज्ञानाचाही खून  पाडशील 

अहंकाराविषयी अगदी मार्मिक शब्दात वर्णन करताना डॉ राऊत म्हणतात की , अहंकाराने माणूस माणसातील माणूसपण विसरून बसतो , आकाश ही ठेंगणं त्यापुढे वाटू लागतं , मुळात ज्ञानावर अजाणतेपणाचा परदा पडतो . व तो मूर्खांसारखा वागू लागतो . सहज शब्दाला फिरविण्याचे कसब , मास्टरकी यानं मध्ये आहे व तेवढी प्रामाणिकता लिखाणातून जाणवते .

तुझ्या वाटेवर   जीव मी जाळीन
आणि चेतवीन  दीपमाळा

लाख पावलांनी   येऊ दे अंधार
समर्थ आधार   पणतीचा

अंतरीचा अंधार मिटविण्यासाठी  स्वयं प्रकाशण्याची धडपड व त्यात फिनिक्स प्रमाणे स्वताला जाळून त्यातून नवजन्म वा प्रकाशण्याची उत्कट इच्छा यातून स्पष्ट होते . राऊत यांचे कविमन किती सकारात्मक आहे व त्यांचा उद्देशहही ठळक आहे असे दिसून येते .

समाज संसार यामध्ये नकळत  कोठेना कोठे गुरफटताना आलेली एकाकी , विरक्ती असे काही लिहून जाते .

सरो आले आता  श्वासांचे इंधन
दुःखाचे चुंबन  घेता-घेता

यातून मार्ग शोधताना लेखणीचा भेटलेला सहारा असे काही लिहून जातो . ..

नसा-नसातून  वाजे एकतारी
मृदूंगाला भारी  झाली शाई

कवीच्या वाटेला येणारी सुख-दुःखे लेखणीतून सहज उतरली आहेत.

आमी असे जुने पापी 
संत सारे घालू खापी 

पिढ्यान-पिढ्या चालत आलेली अशिक्षित व अंधश्रद्धाळू भोळ्या जनतेचा फायदा घेत खऱ्या संताना नष्ट करून , भोंदूबाबा (अविचारी, क्रूर प्रवृत्तीचे ) स्वताला थोर समजून ... लोकांची पिळवणूक करणाऱ्या भोंदू तसेच स्वार्थसाधू  साधूना प्रा. राऊत यांच्या लेखणीतून दनका  चांगल्याच प्रकारे देतात . 

ग्रंथातून थोर   एक अनुभव 
कळे त्याची चव  घेतल्याने  

अप्रतिम लेखणीचा हा उत्तम नमुना बघा ... हा जणू जीवनाचा सार आहे . एक अनुभव , ग्रंथातून थोर ... वाह ... हा अनुभव घेतल्याशिवाय येत नाही ... असा अनुभव प्रत्येकाने घ्यावा ... 

वासनेत 
दोष नाही 
अंतर्बाहय 
निर्मल 

अत्यंत छोट्या अभंगातून मोठं मोठे अर्थ रचण्याचे सामर्थ्य यांच्या लिखाण शैलीत आहेत . 

क्रोधाचे तेजाब  जाळी अंतरंगा 
धाव पांडुरंगा  शांतविण्या 

फुटेल गोट्याला   एकवेळ घाम 
व्यवहारी प्रेम   पाझरेना 

विकून खावया  आले गणगोत
माझी तू किंमत मोज देवा

संसारात अडकलेल्या जीवाची जेव्हा फसगत होते असे बघताना,  तेव्हा प्रा. राऊत यांच्या संवेदनांना क्रोध येतो. व ते पांडुरंगाकडे धाव घेतात मन स्थिर होण्यासाठी . मग लेखणीला अमृतासं गोडवा होऊन ती अभंगातून पाझरायला सुरवात होते .

सुचू देत नाही  आकड्याचा खेळ
कसा रोज मेल  जुळवावा

भागवोनी जिने   केले गुणाकार
 राखेत अखेर  उरे शून्य

संसार चक्रातून पुढे सरकताना डॉ. राऊत यांना जीवनाचा ताळेबंद जुळवता-जुळवता पेच उभा राहतो . अखेरी उमगल्यावर शून्यातून शुन्याकडे जाण्याची अदभूत अनुभूती त्यांना येते . वाणिज्य शाखेशी जुडावं असल्यामुळे ताळेबंद लेखणीतून अचूक हेरला आहे . अगदी सहज सोप्या भाषेतून त्यांनी समाज उपयोगी अभंग लिहिली आहेत

तुका झालासे प्रसन्न
माग म्हणे वरदान 

नको गरुड विमान 
नको संतत्वाचे मान 

असे नको काहीबाही 
घाल विठोबाच्या पायी 

प्रा. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांच्या कविमनातून बघताना सभोवताली घडणार-या वाईट चालीरीती भोंदूगिरी समाजात उदभवणाऱ्या समस्या , जातीभेद , विशिष्ट एक बाजू न मांडता मुक्त चौफेर बाजूनी फटकेबाजी  नकारात्मकतेवर  अभंगाच्या माध्यमातून उत्तमरीत्या केली आहे . तुकाराम महाराजाच्या विचारांचा पगडा यांच्या लिखाणात जाणवतो . लिखाणात स्पष्टता व प्रामाणिकता या दोन जमेच्या बाजू रसिकांना मंत्रमुग्ध करतील . खूप मोठी अभंग लिखाणाची पोकळी या दर्जेदार संग्रहातून भरून निघाली आहे . असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही .

तूको बादशाह च्या निमित्याने .... प्रांजळ मत द्यावयाचे झाल्यास विद्यापीठाने अभ्यासक्रमासाठी या अभंग संग्रहाचा विचार करावा. माय मराठी ला सदर अभंगाची गोड अमृतवाणी लाभलेली आहे . नक्कीच या पुस्तकातून समाजाचे वप्रबोधन होईल , यात तीळ मात्र शंका नाही .

डॉ. राऊत यांना  अभंगसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन .... शुभेच्छा ...  लेखनाच्या साखळीत दर्जेदार   पुस्तक दिल्याबद्दल आभार व ....


-समीक्षक 
-प्रवीण बाबुलाल हटकर 
मु. पो. ता. बार्शीटाकळी 
जिल्हा अकोला 
८०५५२१३२८१

No comments:

Post a Comment